सातारा : साताऱ्यातील स्व. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेला प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून २४७ कोटी मिळालेले आहेत. हा प्रकल्प मार्गी लागावा म्हणून माढ्याचे भाजप खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, माण खटावचे आमदार जयकुमार गोरे आणि विधान परिषद आमदार सदाभाऊ खोत यांनी प्रयत्न केले. विरोधी पक्षनेते यांनी केंद्राचे आभार मानत सातारा जिल्ह्यातील माण, खटाव या दुष्काळी भागाला या प्रकल्पाचा मोठा लाभ होणार असल्याचं म्हटलंय. जिहे काठापूर योजनेमुळे २७ हजार हेक्टर क्षेत्र सिंचित होणार असून हजारो शेतकर्यांना लाभ मिळणार आहे. खा. रणजितसिंग नाईक निंबाळकर यांनी जलशक्ती मंत्रालयाच्या संसदीय समितीचे सदस्य म्हणून सुद्धा सातत्याने हा विषय लावून धरला होता, असं म्हणत फडणवीसांनी नाईक निंबाळकरांच्या कामाला पोचपावती दिली आहे. देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? "गुरुवर्य स्व. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेचा (जिहे-कठापूर) प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत केंद्रीय प्रकल्प म्हणून समावेश केल्याबद्दल तसेच यासाठी 247 कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा मी अतिशय आभारी आहे. सातारा जिल्ह्यातील माण, खटाव या दुष्काळी भागाला या प्रकल्पाचा मोठा लाभ यामुळे होणार असून, या प्रकल्पाचा पहिला टप्पा आमच्याच काळात पूर्ण झाला आणि त्यासाठी संपूर्ण निधी सुद्धा आमच्या सरकारने दिला होता." "या प्रकल्पामुळे 27 हजार हेक्टर क्षेत्र सिंचित होणार असून हजारो शेतकर्यांना लाभ मिळणार आहे. खा. रणजितसिंग नाईक निंबाळकर यांनी जलशक्ती मंत्रालयाच्या संसदीय समितीचे सदस्य म्हणून सुद्धा सातत्याने हा विषय लावून धरला होता", असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/eZ5HBQc
via IFTTT
