सांगली : प्रचाराचे तंत्र आता बदलले आहे. आपल्याला कोणत्याही निवडणुकीसाठी आपले सैन्य तयार ठेवले पाहिजे. त्यासाठी बुथ कमिट्यांवर आपल्याला भर द्यावा लागेल. लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करा, त्यांच्याशी सतत संपर्कात रहा, आपला संपर्क कसा आहे यावर यश अवलंबून असते. आपली संघटना विचारधारेवर आधारित पाहिजे, विचारधारेचा कार्यकर्ता पक्षासाठी निष्ठेने काम करतो, असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष यांनी केले. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वात आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेतली. साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार सुमनताई पाटील, आमदार अरुण लाड, सांगली जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, सदाशिव पाटील, सांगली कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर या बैठकीला उपस्थित होते. प्रचाराचे तंत्र आता बदलले आहे. प्रत्यक्षात पटवून देत नाही तोपर्यंत लोक मान्य करत नाहीत. त्यामुळे आपण लोकांशी बोला. आज महागाई इतकी वाढली आहे याबाबत लोकांना सांगा, केंद्र सरकारची पोलखोल करा. या जगात सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणीही आलेले नाही. इथे माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांचाही पराभव झालेला आहे. हे डोक्यात ठेवून कामाला लागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोठी करा, असे आवाहन जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. जलसंपदा विभागाची जबाबदारी मिळाली आहे. या संधीचा उपयोग करून पाण्यापासून सांगली जिल्ह्यातील कोणतेही गाव वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन जयंत पाटील यांनी यावेळी दिले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/85J1VIb
via IFTTT
